कुपनवर लागलेली १० हजारांची वस्तू २ हजार ५०० ला २० ते ३० दिवसात आणून देतो असे सांगून वेंगुर्ला-वडखोल येथील सुमारे २० ते २५ कुटुंबाची सुमारे ८० हजार रुपयांची फसवणूक करणा-या श्री स्वामी समर्थ मार्केटिंग कंपनीवर गुन्हा दाखल करून या गंडा घालणा-या कंपनीवर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी वडखोल ग्रामस्थांनी केली आहे.
वेंगुर्ला-वडखोल येथील रहिवाशांनी आपली फसवणूक झाल्याबाबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे निवेदन वजा तक्रार दाखल केली आहे. यात असे म्हटले आहे की, श्री स्वामी समर्थ मार्केटींग, फ्लॅट नं. १०८, चक्रतुंड अपार्टमेंट, तोडकर हॉस्पीटल जवळ, प्रबोधनकार ठाकरे चौक, भवानी पेठ, पुणे-महाराष्ट्र या मार्केटींग कपंनीचे एजंट ऋषिकेशन विनोद जाधव (रा. सदानिशव नगर, बेळगांव) सह तीन जण मे महिन्यात वडखोल येथे जी.ए.०६-डी-८११५ या सुमो गाडीने आले होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला कुपन दाखवले व दाखवलेल्या कुपणवर ज्या वस्तू दाखविण्यात आले आहेत त्यातील प्रत्येक वस्तूंची किंमत १० हजार असून ऑफरमध्ये २५०० मध्ये देतो म्हणून सांगीतले. सदर व्यक्तीस या किंमतीबाबत विचारले असता त्या वस्तू ह्या कोरोना काळाच्या अगोदरच्या असल्याने कमी किंमतीत विकत देत आहोत असे सांगीतले.
दरम्यान वडखोल येथील काही व्यक्तिनी सदर वस्तू घेतल्या व त्यांना त्या मिळाल्याने आम्ही त्यावर विश्वास ठेवला व कुपण काढले. त्यावेळी त्यांनी सदर वस्तू ह्या तुम्हाला पैसे भरल्यावर १५ ते २० दिवसात मिळतील असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर तसेच दाखविलेल्या आयडी कार्डवर विश्वास ठेवून आम्ही सदर वस्तू मिळतील या आशेने पैसे दिले. काहींनी रोख तर काहींनी गुगल पे केले. याबाबत काही दिवसांनी ऋषिकेशन विनोद जाधव यांच्या मोबाईलवर २९ मे रोजी संफ साधला असता त्यांनी माल आला आहे, काही माल चेक कराचा आहे माल चेक केल्यावर दोन दिवसात गाडीतून वस्तु घेऊन येतो असे सांगीतले. मात्र, काही दिवस गेल्यावर सदर मोबाईल हे बंद असल्याचे निदर्शनास आल्याने आम्ही यामध्ये फसलो असल्याचे आमच्या निदर्शनास आले. सदर व्यक्तींनी वडखोल येथील २० ते २५ जणांची सुमारे ८० हजारच्यावर पैशाची फसवणुक केली आहे. तरी सदर कंपनी व त्या व्यक्तिची चौकशी करून त्यांना शोधून काढावे व वडखोल रहिवाशांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.